काक्रंबा उड्डाणपूलसाठी वापरलेला मुरूम प्रशासनाच्या डोळ्यात फेकतोय धूळ ?
काक्रंबा उड्डाणपूलाचे काम अखेर सुरू, पण अवैध मुरुम उत्खननाचा गंभीर प्रकार
काम करणाऱ्या कंपनी कढून प्रशासनाची दिशाभूल
तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाले आहे. स्थानिक नागरीक आणि प्रवाशांसाठी दिलासा देणारी ही बाब असली, तरी संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंत्राटदाराने स्थानिक प्रशासनाची फसवणूक करत आपल्या बांधकामासाठी लागणारा मुरुम आजूबाजूच्या गावांमधून अवैधरित्या उत्खनन करून आणण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नियम डावलून कामकाज सुरू ?
काक्रंबा आणि परिसरातील इतर गावांमध्ये रात्रीच्या वेळी बेकायदेशीररीत्या जेसीबी व डंपरच्या साहाय्याने मुरुम उचलला जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे रस्ते खराब होणे, धूळधक्कड वाढणे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणे असे परिणाम दिसून येत आहेत.
जनतेमधून होत आहे कार्यवाहीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तसेच उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची उपलब्धता कायदेशीर मार्गाने व पर्यावरणस्नेही पद्धतीने व्हावी, अशी मागणीही होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
उड्डाणपूल आवश्यक का?
औसा तुळजापूर मार्गावर हा उड्डाणपूल असल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते त्यांचा वेळ वाचण्यासाठी हा उड्डाणपूल आवश्यक आहे मात्र नियमांना हरताळ फासून जर याचे काम केले जात असेल तर त्यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार आहे.
0 टिप्पण्या