सोयाबीनचे 13 ते 14 कोटी रुपये अडवल्याने शेतकरी अडचणीत; जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
———
प्रतिनिधी शहाजी आगळे
धाराशिव येथील विठ्ठल श्रीरंग काकडे या आडतदुकानदाराने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सोयाबीनचे तब्बल 13 ते 14 कोटी रुपयांचे पैसे अडवून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अनेक महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, याविरोधात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, बाजार समितीच्या माध्यमातून सोयाबीन विक्री केल्यानंतर ठरलेल्या कालावधीत पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र संबंधित आडतदुकानदाराने वारंवार आश्वासने देऊनही अद्याप रक्कम अदा केलेली नाही. कर्जफेड, शेतीसाठी लागणारे बियाणे, खते तसेच घरखर्च भागवणे, मुलीच्या लग्नासाठी लागणार खर्च, एखाद्या शेतकऱ्याचा दवाखान्याचा खर्च करणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ठिय्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करून अडवलेली रक्कम मिळवून देण्याची मागणी केली. दोषी आडतदुकानदारावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.



0 टिप्पण्या